नियमांचे पालन करुन शांतता भंग न होता गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा करावा

नाशिक (प्रतिनिधी): आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना कोरोना आणि संसर्गजन्य परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. उत्सव आनंदाने साजरे करा, मात्र हा उत्सव साजरा करतांना नियम व अटींचे पालन करुन शांतता भंग न होतात भक्तीभावाने साजरा करावा. तसेच या उत्सवातून कोरोनापासून बचाव कसा करता येईल याबाबत जनजागृतीवर भर दिल्यास खऱ्या अर्थी गणेशोत्सवाचे फलीत होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने आयोजित बैठकित पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे,  माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या काळात आलेल्या सण उत्सव आपण गर्दी न करता साजरे केले. अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून, रुग्ण वाढत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊननंतर जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक वाढली असल्याने गणेशोत्सव साजरा करतांना काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे.

नाशिक शहरात एकूण 750 सार्वजनिक महामंडळे असून किमान दिड लाखांहून अधिक घरघुती गणेश मंडळे असून या सर्व मंडळांनी सहकार्यची भुमिका दाखविली आहे. गणपतीची बसविण्यासाठी गणपतीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट, घरगुतीसाठी 2 फूट असावी आणि मंडप उभारणीबाबतच्या सूचना शासनाकडून येतीन त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. गणेशोत्सवासाठी यंदा करण्यात आलेले नियम हे याच वर्षांपूरते मर्यादित असतील पुढील वर्षी हीच नियमावली लागू राहणार नाही. तसेच गणेशोत्सवासाठी परवानगी सहज उपलब्ध करून देण्यात याव्यात असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक मंडळाच्या आरतीसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी स्वत:रोखावे ज्याने करुन कोरोनाला अटकाव करण्यास मदत होईल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती मुर्त्यांच्या  विक्रीसाठी मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच गणपती विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची गर्दी होवू नये यासाठी कुत्रिम तलावांचा वापर करावा असे आवाहन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी उपस्थित सर्व गणेशमंडळाच्या प्रतिनिधींना केले.

गणपती विर्सजनानंतरचे मुर्तीचे भग्न अवयवांचे काही छायाचित्रे किंवा चलत छायाचित्रे सोशल मिडीया व प्रसार माध्यमांद्वारे प्रसारण होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक त्या उपायायोजना करुन  मुर्तीच्या भग्न अवयवांचे सन्मानपूर्वक विसर्जन करावे. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाला असल्याकारणाने पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सर्व लोकप्रतिनिधी, गणेशमंडळाचे प्रतिनिधी यांनी दक्षता घ्यावी. तसेच गणपती ही मंगलमूर्ती असून आनंद देणारी असल्याने भक्तीभावाने हा उत्सव साजरा करण्याबाबतचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

खासदार गोडसे म्हणाले की, रस्त्यावर स्टॉल न लावता मोकळ्या जागेत लावण्याचे नियोजन करण्यात यावे तसेच प्रभागानुसार कृत्रिम तलाव करण्यात येवून त्यामध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन करण्याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी बैठकित मांडल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790