नाशिक: जिथं लग्नाची वरात निघणार, तिथंच निघाली अंत्ययात्रा; लग्नाच्या ३ दिवसांआधी वधूपित्याचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): एकुलती एक मुलीचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असताना हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन झाल्याची घटना सातपूर येथील श्रमिकनगर येथे घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील सातपूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकुलत्या एक मुलीच्या लग्नाला अवघे तीन दिवस बाकी असतानाच घरात दुर्दैवी प्रसंग घडला आहे. मुलीच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील गायकवाड कुटुंब नाशिकच्या सातपूर येथील श्रमिकनगरमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा उत्साह होता. परंतु या उत्साहावर पाणी फिरले असून प्रवीण रामभाऊ गायकवाड (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मुलीच्या लग्नाला अवघे तीन दिवस बाकी अशी दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान, प्रवीण गायकवाड यांची मुलगी दीपांजली हिचा शुक्रवार १२ मे रोजी विवाह होता. परंतु त्या आधीच मंगळवारी ९ मे रोजी गायकवाड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घरात लग्नाची सर्वत्र तयारी पूर्णत्वास आली होती. गायकवाड कुटुंब विवाहाच्या आनंदात मग्न असतानाच त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. ज्या मुलीच्या डोळ्यात आज सासरी जाताना माहेरील आठवणीने पाणी येणार होते, त्याच मुलीच्या डोळ्यात आज वडिलांच्या निधनाने अश्रू दाटले.
आपल्या मुलांचा विवाह सोहळा हा कुठल्याही पित्यासाठी त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो . नाशिक शहरात वास्तव्यास असणाऱ्या प्रवीण गायकवाड हेदेखील मुलगी दीपांजली हिचा विवाह आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी उत्सुक होते. परंतु विवाहाला तीन दिवस बाकी असतानाच ९ मे रोजी प्रवीण गायकवाड यांचे दुर्दैवी निधन झाले.