
घोटीजवळ झालेल्या अपघातात तीन बालिकांसह एका तरुणाचा जागीच मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): घोटी मुंबई-नाशिक मार्गावर मुंढेगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवर असलेल्या सोमवार (ता. ८ ) सायंकाळी पाच वाजता झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले.
मुंढेगाव शिवारात चौफुली लगत मुंढेगाव मार्गे घोटीकडे जात असताना दुचाकी क्रमांक ( एमएच. १५, एफ डब्ल्यू, ०४६० ) वर तुषार हरी कडू ( वय २५ ) हे आपल्या घराकडे जात होते. सोबत पायल ज्ञानेश्वर गतिर ( वय ११ ), विशाखा ज्ञानेश्वर गतिर ( वय ७ ), साक्षी उर्फ ईश्वरी हिरामण डावखर ( वय १० ) यांना मागून आलेल्या अज्ञात आयशर वाहनाने धडक दिल्याने यातील चार जण जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच टोल प्रशासन, घोटी पोलीस यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्राण ज्योत त्याआधीच मालवली होती. डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने जागेवरच हालचाल बंद झाली होती.
या घटनेने मुंढेगाव हादरून गेले. प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरून अपघातग्रस्तांना मदत करतांना दिसले. घोटी ग्रामिण रुग्णालयात जखमींना आणण्यात आल्याची माहिती मिळताच नागरिक, आप्तस्वकीय यांनी एकच गर्दी करत हंबरडा फोडला होता.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास ह्या करत आहे. मुंढेगाव शिवाराती चौफुलीवर ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करत उड्डाणपुलाचे कामकाज करायला हवे, ही मागणी गावकऱ्यांनी या आधी देखील केली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी अनेक अपघात होऊन शेकडो निरपराध जीव गेले. तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे कामकाज सुरू करावे अशी मागणी देखील येथील ग्रामस्थ करत आहे