पुणे, दि. २५ मे, २०२५: गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर रविवारी (दि. २५) महाराष्ट्रात दाखल झाला. याबाबतची अधिकृत घोषणा हवामान विभागाने रविवारी केली.
कालच मान्सून केरळात दाखल झाला होता आणि त्यानंतर दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, राज्यात मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही तासांतच मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज २५ मे रोजी दक्षिण कोकणात मान्सून दाखल,राज्यात आगमनाच्या जवळपास १० दिवस आधीच.(५ जून सामान्य तारीख). राज्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे व निश्चितच मान्सून संबंधित कामांना गती मिळेल.राज्यात मान्सूनच्या पुढील आगमनासाठी अनुकूल परिस्थिती.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 25, 2025
राज्यात मान्सून आगमन २०११ ते २०२५ आलेख खाली. pic.twitter.com/46egg9fpxR
आजपासून शनिवार दि. 31 मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर व प्रभाव अधिक राहणार आहे. तर कोकण वगळता खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आज व उद्या (रविवार व सोमवारी) जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवार दि. २७ मे पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नाशकात जोरदार पावसाचा अंदाज
नाशिक जिल्ह्यात २७ मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात व घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा प्रतितास 40-50 कि.मी. वेगाने वाहण्याची शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविली आहे. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामान पूवार्नुमानाकरीता मेघदुत व मेघगर्जनेसह पावसासाठी दामिनी मोबाईल अॅपचा उपयोग करावा, असा सल्लाही या केंद्राने दिला आहे.