
नाशिक। दि. २७ एप्रिल २०२६: राज्यात उष्ण व दमट हवामानाचा दुहेरी परिणाम जाणवत असून नाशिकमध्ये उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअसवर स्थिरावले. विशेष म्हणजे, केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या तापमानातही वाढ होत असल्याने नागरिकांना सतत उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. किमान तापमान १ अंशाने वाढून २३.४ अंशांवर पोहोचले असून, रात्रीही हवेत गारवा नसल्याने नागरिकांना दिलासा मिळत नाही.
पुढील पाच दिवस उष्णतेचा प्रभाव कायम:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी (दि. २७) राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवली असली, तरी बहुतांश भागात कमाल तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून तात्काळ दिलासा मिळण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.
‘अल निनो’चा प्रभाव; पाणी नियोजनाला वेग:
एल निनो च्या संभाव्य प्रभावामुळे यंदाचा पावसाळा उशिरा येण्याची किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून राज्यस्तरावर पाणी व्यवस्थापनाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
गंगापूर धरणातील साठा घटला; शहरावर पाणीटंचाईचे सावट:
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण येथे गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३१९४ दलघफू (५६.१३ टक्के) साठा उपलब्ध होता, तर यंदा तो ३०४८ दलघफू (५४.१४ टक्के) इतकाच राहिला आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यातील २६ लहान-मोठ्या जलप्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ दिसून येत आहे. गतवर्षी २३२७५ दलघफू (३२.९६ टक्के) साठा होता, तर यंदा तो ३१२८५ दलघफू (४४.३० टक्के) म्हणजेच सुमारे १२ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची स्थिती तुलनेने समाधानकारक असली, तरी शहरासाठी महत्त्वाच्या गंगापूर धरणातील घटलेला साठा लक्षात घेता नाशिककरांवर संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे.
![]()

