नाशिक। दि. ४ डिसेंबर २०२५: पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोगांच्या माध्यमातून उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव करण्यात येतो. त्यासाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धा २०२५- २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
शासन निर्णयान्वये रब्बी हंगाम २०२५ मध्येही पीक स्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१) पीक स्पर्धेतील पिके :
रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण ५ पिके)
२) पात्रता निकषः
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीक स्पर्धेत सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रात सलग लागवड असणे आवश्यक आहे.
३) अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२,८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यक, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
४) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीखः
रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील.
ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस – ३१ डिसेंबर 2025
तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
५) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क:
पीक निहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील. व आदिवासी गटासाठी रक्कम रुपये १५०/- राहील.
पीक स्पर्धा बक्षीसाचे स्वरूप:
तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीवर पहिले बक्षीस रूपये 5 हजार, दुसरे बक्षीस रूपये 3 हजार व तिसरे बक्षीस रूपये 2 हजार असे आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस रूपये 10 हजार, दुसरे बक्षीस रूपये 7 हजार व तिसरे बक्षीस रूपये 5 हजार असे आहे. तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस रूपये 50 हजार, दुसरे बक्षीस रूपये 40 हजार व तिसरे बक्षीस रूपये 30 हजार असे आहे.
पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ https://krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
![]()
