नाशिक। दि. ६ फेब्रुवारी २०२६: नाशिक जिल्ह्यातील प्रमुख व मध्यम प्रकल्पांतील धरणांमध्ये सध्या एकूण ७६.९० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पाटबंधारे विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत काही धरणांतील साठ्यात वाढ दिसून येत असली, तरी येणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटेकोर वापर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७ धरणे आहेत. सध्या सुमारे ५४,३०८ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर, दारणा, कडवा, गिरणा, ओझरखेड, वैतरणा आदी प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा नोंदविण्यात आला आहे.
मध्यम प्रकल्पांच्या बाबतीत जिल्ह्यातील १९ धरणांमध्ये सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. काही धरणांमध्ये मात्र साठ्याचे प्रमाण तुलनेने कमी असून, त्याठिकाणी उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शेतीसाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पुढील महिन्यांत पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
उन्हाळ्यासाठी काय परिस्थिती?:
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होण्याचे संकेत मिळत असून, मार्च ते मे या कालावधीत पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. शहरांसह ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी धरणातील पाण्याचा मितव्ययी वापर, अनावश्यक पाणीउपसा टाळणे आणि सिंचनासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
पाटबंधारे विभागाकडून धरणांतील पाणीसाठ्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
![]()

