नाशिक। दि. ८ फेब्रुवारी २०२६: राज्यात शनिवारी आकाश निरभ्र राहिल्याने पुढील तीन दिवस सकाळी व रात्री थंडीची तीव्रता जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशात हलक्या स्वरूपाचा हिमवर्षाव सुरू असून, ही स्थिती आगामी ७२ तास कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात हवेत आर्द्रतेचे प्रमाण घटल्याने वातावरण अधिक कोरडे झाले आहे. परिणामी पहाटे गारठा वाढला असून दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. नाशिक शहरात शनिवारी कमाल तापमान ३१.१ अंश, तर किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवस-रात्र तापमानातील सुमारे १८.६ अंशांची मोठी तफावत असल्याने दिवसा उष्णता आणि रात्री थंडी असे विषम हवामान अनुभवास येत आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत ८ फेब्रुवारी रोजी हवामान कोरडे ते किंचित उष्ण राहण्याचा अंदाज आहे. मुंबई परिसरात कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांदरम्यान, तर किमान तापमान २१ ते २३ अंशांच्या आसपास राहू शकते.
शनिवारीच्या तुलनेत तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला तरी सकाळी हलका गारवा आणि दुपारी उष्णतेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात अधूनमधून ढगाळ वातावरण दिसू शकते; मात्र पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
![]()

