नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास दोन किलोमीटरच्या नदीतील परिसरात हे मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत.

महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन फुटल्यानं दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मृत मासे पाण्यावर तरंगत असून नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जिवाणू देखील आढळल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नद्यांचं प्रदूषण जलचरांच्या जीवावर उठलं:
याआधीही वालदेवी नदीपात्रातील नांदूरमध्यमेश्वर नदीपात्रात हजारो मासे मृत झाल्याची घटना घडली होती. गटारींच्या आणि कारखान्यांमधील रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा वालदेवी मृत मासे आढळून आले आहेत. नद्यांचं प्रदूषण माशांच्या आणि अन्य जलचरांच्या जीवावर उठलंय. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज:
दरम्यान, नाशिकच्या गोदावरी नदीसह अन्य नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. थेट गटारींचे गोदापात्रात मिसळणारे पाणी, औद्योगिक क्षेत्रातले कारखाने आणि महापालिकेच्या एसटीपी प्लँटमधून प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी यामुळे गोदावरीसह अन्य नद्यांचीही अक्षरशः गटारगंगा झाल्याची अवस्था आहे. त्यातच आता नद्यांचे हे प्रदूषण थेट नदीतल्या जलचर प्राण्यांच्या जीवावर उठल्याने ही चिंतेची बाब बनलीय. त्यामुळे या नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज निर्माण झालीय.