नाशिक। दि. १० जून २०२६: जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, मालक, उद्योजकांनी बाल/किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये. बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी कामगार उपायुक्त, नाशिक (गाळा क्रमांक १८ व १९, चौथा मजला, आयटीआय सिग्नलजवळ, सातपूर, नाशिक), संबंधित क्षेत्रीय पोलिस ठाणे किंवा १०९८ या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, नाशिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
भारतीय राज्य घटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य बालकांचे मूलभूत अधिकार आहेत. बालकांचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायमस्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने १४ वर्षांखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम पारीत केला आहे.
त्यानुसार १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच १४ वर्षे पूर्ण परंतु १८ वर्षे पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेत कामावर ठेवणे गुन्हा आहे. मालक, नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यास ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास किंवा २० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात, अशी तरतूद आहे.
बालमजुरी अनिष्ट प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडित असल्यामुळे या प्रथेविरुद्ध जनजागृती होणे आवश्यक आहे. यानिमित्त दरवर्षी १२ जून हा दिवस जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून पाळला जातो, असेही सहायक कामगार आयुक्तांनी कळविले आहे.
![]()

