नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मोबाइल फोन गहाण ठेवल्यानंतर पुन्हा मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांमध्येच जुंपली. एकाने शस्त्राने दुसऱ्या मित्रावर सपासप वार केल्याची घटना भारतनगर झोपडपट्टी परिसरात बुधवारी (दि.१९) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली. घाव वर्मी लागल्याने परवेज शेख (३१ वर्षे, रा. भारतनगर) याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी त्याचा हल्लेखोर मित्र आकिब गुफरान इद्रिस (३०, रा. भारतनगर) यास ताब्यात घेतले असून, दंगलनियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा रोडलगत असलेल्या भारतनगर येथे राहणाऱ्या परवेज याने स्वतःचा मोबाइल आकिब याच्याकडे गहाण ठेवून ४,५०० रुपये घेतले होते.
त्याने मोबाइल पुन्हा मागितला असता त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी भारतनगर झोपडपट्टीमधील मोकळ्या मैदानात आकिब याने त्याच्यावर धारधार चाकूने वार केले. यामुळे परवेज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
तत्काळ परिसरातून संशयित आकिब यास ताब्यात घेण्यात आले. परिसरात शांतता असून, रात्री कुठलाही अनुचित प्रकार घड्डू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दंगलनियंत्रण पथकाची तुकडी भारतनगर येथे तैनात करण्यात आली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.