नाशिक (प्रतिनिधी): मार्च महिन्यात बोधलेनगरच्या पाठीमागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्याने उमेश आणि प्रशांत भगवान जाधव या सख्ख्या भावांचा निघृणपणे खून केला होता. या खून प्रकरणाची स्थानिक विशेष तपास पथकाकडून सखोल तपास केला जात आहे. या पथकाने आतापर्यंत तीन आरोपी निष्पन्न केले आहे. गुंडांविरोधी पथकाने पुन्हा एका आरोपीला ठाणे येथील एका झोपडपट्टीत सापळा रचून शिताफीने जाळ्यात घेतले. रूपेश दिलीप रोकडे (३९) असे अटक केलेल्या नवव्या आरोपीचे नाव आहे.
दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून दि. १९ मार्चला आंबेडकरवाडीमध्ये जाधव बंधुंच्या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या खून प्रकरणात सखोल तपासाकरिता स्वतंत्ररीत्या स्थानिक विशेष तपास पथकाने ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, दुचाकी, तसेच हत्यारेही एसआयटीकडून जप्त करण्यात आली आहेत.
दुहेरी खून प्रकरणात नववा आरोपी रूपेश रोकडे हा ठाणे जिल्ह्यातील मनोरमानगर आदिवासी चाळ येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रूपेश हा तेथे अस्तित्व लपवून वास्तव्य करत असल्याबाबतची माहिती सहायक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाली होती.
मोहिते यांनी पथकासह ठाणे गाठून त्यास शिताफीने जाळ्यात घेतले. खुनात 3 वापरलेली हत्यारे दडविण्यासाठी व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये याचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. यास मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
![]()

