नाशिक। दि. १ फेब्रुवारी २०२६: भगूर येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ६९ वर्षीय महिलेच्या हातातील मौल्यवान सोन्याची बांगडी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशिला श्रीराम कातकाडे (वय ६९, रा. भगूर) या मंगळवारी (दि. २७ जानेवारी) सायंकाळी स्थानिक आठवडे बाजारात गेल्या होत्या. सायंकाळी चार ते आठ या वेळेत बाजार परिसरात मोठी गर्दी असते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या डाव्या हातातील सुमारे अडीच तोळे वजनाची, अंदाजे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची बांगडी बेमालूमपणे काढून घेतली.
थोड्या वेळानंतर दागिना गायब झाल्याचे लक्षात येताच कातकाडे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एम. बी. चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
![]()


