पुणे (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने रविवारी (दि. १९) निकोबार बेटांवर धडक दिली.
मान्सूनने रविवारी मालदीवचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. सध्याचे पोषक हवामान पाहता ३१ मेपर्यंत मान्सून केरळला, तर ६ ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
‘ला नीना’ च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये ३१ मे, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.