नवी दिल्ली। दि. ८ मार्च २०२६: आखाती प्रदेशात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे परिणाम आता थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले आहेत. इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती गॅस वितरणासंदर्भात काही महत्त्वाचे बदल केले असून त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरगुती एलपीजी ग्राहकांना साधारणपणे दोन सिलिंडर ठेवण्याची परवानगी असते. पूर्वी पहिला सिलिंडर घेतल्यानंतर दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ दिवसांनंतर बुकिंग करता येत होते. मात्र आता हा कालावधी वाढवून २५ दिवसांचा करण्यात आला आहे. तसेच आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर महिन्यातून केवळ एकदाच वितरित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांना लेखी आदेशही पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी ऑनलाईन गॅस आरक्षण करण्यात येत असल्याने यंत्रणेवर ताण निर्माण होत असून काही ठिकाणी अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर येत आहे.
याचदरम्यान तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात शनिवारी ६० रुपयांची वाढ केली असून ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे. गेल्या ११ महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत २०१६ पासून मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या १० कोटींहून अधिक लाभार्थी कुटुंबांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.
![]()

