महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई/नाशिक। दि. २ सप्टेंबर २०२६: ऑगस्टमध्ये पावसाने काही काळ ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

ओडिशाच्या परिसरातून पश्चिमेकडे सरकणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि दक्षिण गुजरातपासून उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेली वाऱ्यांची द्रोणीय रेषा यामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. २ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून या भागातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक; ४२.६० लाखांची फसवणूक

दरम्यान, विदर्भासाठीही पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, २ ते ४ सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नागपूरच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मात्र, या तात्पुरत्या पावसामुळे ऑगस्टमधील तूट कितपत भरून निघणार, हा प्रश्न कायम आहे. कारण संपूर्ण सप्टेंबर महिन्यासाठी विदर्भातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या लगतच्या काही भागांचा अपवाद वगळता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाची स्थिती सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सीएनजी दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ.. जाणून घ्या नवे दर

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या लगतच्या परिसरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम २ ते ४ सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भात जाणवू शकतो. या काळात गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि नागपूरच्या काही भागांत मुसळधार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण विदर्भात पावसाची सुमारे २२ टक्के तूट नोंदली गेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस होण्याची शक्यता असली तरी संपूर्ण महिन्याचा अंदाज सरासरीपेक्षा कमी पावसाचा असल्याने आतापर्यंतची तूट पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक परिमंडळातील ७४ हजार ५५७ ग्राहक वीज निर्माते; छतावर बसविली २६० मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा

त्यामुळे आगामी काही दिवसांत होणाऱ्या पावसाकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस पिकांना कितपत दिलासा देतो आणि ऑगस्टमधील पावसाची तूट किती भरून काढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790