
नाशिक। दि.२३ ऑगस्ट २०२६: जिल्हा परिषद नाशिक आणि विनोबा ॲप–ओपन लिंक्स फाउंडेशन (OLF) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव, शैक्षणिक नवोपक्रमांची देवाणघेवाण आणि शिक्षक–अधिकारी संवादाला बळ देण्यासाठी *‘शिक्षण उत्सव २०२६’*चे आयोजन नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलच्या रॉयल हॉलमध्ये करण्यात आले.
कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, DIET चे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बडे, विविध तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना आदर्श शाळा घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, स्वच्छ व सुरक्षित शालेय वातावरण, लोकसहभाग तसेच शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चांगले कार्य अनेकदा शाळा वा केंद्रस्तरापर्यंत मर्यादित राहते. अशा कार्याची जिल्हास्तरावर दखल घेऊन त्याची व्यापक देवाणघेवाण व्हावी, शिक्षकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या योगदानाला योग्य व्यासपीठ मिळावे, हा शिक्षण उत्सवामागील प्रमुख उद्देश होता.
नाशिक जिल्ह्यात ३,२६४ शाळा आणि ११,८०८ शिक्षक व मुख्याध्यापक विनोबा उपक्रमाशी जोडले गेले असून, शिक्षकांनी विविध शैक्षणिक उपक्रम व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींच्या ३३ हजारांहून अधिक पोस्ट्सच्या माध्यमातून देवाणघेवाण केली आहे.
कार्यक्रमात गटचर्चा, टेबल चर्चा, सादरीकरण, प्रश्नोत्तर व पॅनल चर्चेद्वारे NIPUN Maharashtra, PGI, शैक्षणिक गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर विचारांची देवाणघेवाण झाली.
यावेळी क्लस्टर, शाळा आणि शिक्षक या तीन स्तरांवर उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. विनोबा उपक्रमातील सक्रिय सहभाग, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, लोकसहभागातून शाळा विकास, महावाचन, Spelling Bee, English Conversation, कथाकथन तसेच सातत्यपूर्ण शैक्षणिक सहभाग अशा विविध योगदानांची दखल घेण्यात आली.
‘शिक्षण उत्सव २०२६’ हा शिक्षकांच्या कार्याची दखल, अनुभवांची देवाणघेवाण आणि शिक्षणातील सकारात्मक परिवर्तनासाठी सामूहिक बांधिलकी मजबूत करणारा उपक्रम ठरला.
![]()


