नाशिक। दि. ११ जुलै २०२६: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असला, तरी नाशिककरांना अद्याप पाणीकपातीतून दिलासा मिळालेला नाही. महापालिकेकडून लागू करण्यात आलेली पाणीकपात पूर्ववत असून, सध्या नियमित वेळापत्रकानुसारच पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणीकपात कधी हटविण्यात येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शहरातील जलवाहिनी तसेच पंपिंग केंद्रांशी संबंधित तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे शनिवारी (दि. ११) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामांनंतर रविवारी (दि. १२) पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीकपात रद्द करण्याबाबत अद्याप निर्णय नाही:
गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढला असला, तरी पाणीकपात रद्द करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
“गंगापूर धरणात सुमारे ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, पाणीकपात रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढील पावसाची परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.’- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
![]()


