
नाशिक। दि. ३ मे २०२६: नाशिक शहर पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्याची मोहीम सातत्याने राबवली असून, त्यातून मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ मधील सात पोलिस ठाण्यांत नोंद असलेल्या प्रकरणांतील ४२ फिर्यादींना एकूण १ कोटी ४२ लाख ६७ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
या कारवाईत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका या पोलिस ठाण्यांचा सहभाग होता. परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४४२ ग्रॅम सोन्याचे दागिने, २३० ग्रॅम चांदी, ८ मोबाईल फोन, १५ दुचाकी, १२ चारचाकी वाहने तसेच २ लाख ४२ हजार रुपयांच्या रोकडचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सरकारवाडा पोलिस ठाण्याने सर्वाधिक ३८० ग्रॅम सोन्याचे दागिने फिर्यादींना परत मिळवून दिले.
दरम्यान, गुन्ह्यातील जप्त मालमत्ता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शक्य तितक्या लवकर संबंधित मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी’ नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
![]()

