राज्यात उष्णतेची लाट तीव्र; अकोला सर्वाधिक ४३.१ तर नाशिक ३९.५ अंश सेल्सिअस

नाशिक। दि. १३ एप्रिल २०२६: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. अकोला येथे ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. सोलापूर ४१.६ अंशांसह दुसऱ्या क्रमांकावर असून गेल्या तीन दिवसांत तेथील तापमानात तब्बल ३.५ अंशांची वाढ झाली आहे. विदर्भातही उष्णतेचा तडाखा कायम असून अमरावती येथे ४२.४ तर वर्धा येथे ४२ अंश तापमान नोंदले गेले.

🔎 हे वाचलं का?:  घरफोडीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; सोन्या-चांदीसह एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस):
अकोला: ४३.१०
अमरावती: ४२.४०
वर्धा: ४२.००
सोलापूर: ४१.६०
नागपूर: ४१.४०
नाशिक: ३९.५

दरम्यान, नाशिकमध्येही यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३९.५ अंश तापमान रविवारी (दि. १२) नोंदविण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे शहरातील जनजीवनावर परिणाम जाणवत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता आणि दमटपणा वाढल्याने दिवस-रात्र उकाड्याची तीव्रता जाणवत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तात्पुरते एपीएमसी परवाने व खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती

रविवारी नाशिकमध्ये किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांपासून हवामान कोरडे असल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील काही दिवसांत तापमान ४३ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून राज्यासाठी दमट व उष्ण हवामानाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790