नाशिक। दि. ७ एप्रिल २०२६: गंगापूररोडवरील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या नवश्या गणपती परिसरातील जुन्या वटवृक्षांच्या तोडीविरोधात सोमवारी (दि. ६) नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी वृक्षतोडीसाठी घटनास्थळी पोहोचताच आंदोलनाला सुरुवात झाली. काही आंदोलकांनी झाडांवर चढून निदर्शने केली, तर ‘वृक्ष वाचवा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
दरम्यान, या वृक्षांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढत असल्याचा दावा करत काही स्थानिक नागरिकांनी वृक्षतोडीला समर्थन दर्शवले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे १० वाजता सुरू झालेले आंदोलन तब्बल पाच तास चालले.
वृक्षतोड होणार असल्याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी झाडांच्या फांद्यांवर चढून निषेध ‘वृक्ष वाचवा’ चे फलक झळकावले. मात्र, महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षतोडीची कारवाई सुरूच ठेवण्यात आली.
आंदोलक व पोलिसांत धक्काबुक्की:
परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस व्हॅनमधून सरकारवाडा पोलिस ठाण्यात हलवण्यात आले. आंदोलकांना हटवल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात दोन मोठे वटवृक्ष तोडण्यात आले. या मार्गावरील एकूण ४४ वृक्ष तोडले जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी महापालिकेच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
![]()

