नाशिक। दि. ३१ मार्च २०२६: हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक व हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी विभागामार्फत एप्रिल २०२६ महिन्यात राज्यभरात चार “विशेष डिजिटल शेती शाळा” आयोजित करण्यात येत असून, या डिजिटल शेती शाळांमध्ये राज्यातील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मंडळे, बीजोत्पादक तसेच वनपट्टाधारक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा उद्देश शेतीचा उत्पादन खर्च कमी करून प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवून ठेवणे हा आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी विभागासोबत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग आदी यंत्रणा सहभागी होत आहेत. अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून या चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाची अंमलबजावणी पानी फाउंडेशन यांच्या सहकार्याने केली जाणार आहे.
या डिजिटल शेती शाळांद्वारे कृषी तज्ञ, शास्त्रज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
असे आहे शेतीशाळांचे वेळापत्रक :
👉 शेतीशाळा 1 (1 एप्रिल 2026) : पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे, टोकण, कमी मशागत, आंतरपीक पद्धती, बीजप्रक्रिया
👉 शेतीशाळा 2 (8 एप्रिल 2026): जैविक व नैसर्गिक निविष्ठा – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा
👉 शेतीशाळा 3 (15 एप्रिल 2026): एकात्मिक कीड व्यवस्थापन – सापळा पिके, चिकट सापळे, मित्र किटक संवर्धन
👉 शेतीशाळा 4 ( 22 एप्रिल 2026): भात शेती सुधारित तंत्र – DSR, श्री पद्धत, यांत्रिकी लागवड
सर्व शेती शाळा संबंधित तारखांना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून, त्यांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन तसेच उमेद यांच्या यूट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे.
![]()

