
नाशिक। दि. १६ मार्च २०२६: शेती क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि प्रयोगशीलता अत्यंत महत्त्वाची असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
नाशिक जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, ‘आत्मा’ व ‘माविम’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी कुंभ 2026 मध्ये विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र वाघ (नाशिक), अशोक डमाळे (कळवण), संदीप मेढे (मालेगाव), भटू पाटील (निफाड) यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन माहिती घेतली. तसेच शासकीय कृषी प्रदर्शनाचे इतक्या भव्य स्वरूपात प्रथमच आयोजन केल्याबद्दल आयोजक व कृषी विभागाचे अभिनंदन केले.
दरम्यान, या जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत आज कांदा पीक लागवड तंत्रज्ञान व आधुनिक साठवण पद्धती या विषयावर शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी पुरस्काराने गौरविण्यात आले.
या परिसंवादात कांदा उत्पादन वाढीसाठी योग्य बियाणे निवड, संतुलित खत व्यवस्थापन तसेच काढणीची योग्य पद्धत याबाबत कांदा संशोधन केंद्र, राजगुरुनगर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कांदा साठवणुकीत होणारे नुकसान, त्याची कारणे व आधुनिक साठवण पद्धती याविषयी डॉ. प्रवीण आमरे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
![]()

