
नाशिक। दि. १७ फेब्रुवारी २०२६: हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत सोहळा होणार आहे. यानिमित्त जनजागृतीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गुरमितसिंग संधू, करमजित सिंग, हरमन सिंग, मिल्खा सिंग, मनप्रीत सिंग, श्री. शर्मा आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन हे चित्ररथ हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या कार्याची माहिती देणार आहे. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या समागम सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना सर्वतोपरी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
![]()

