🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक जिल्ह्यात १४ धरणांतून विसर्ग; गंगापूरमधून ४१४ क्यूसेक पाणी सोडले

नाशिक | दि. २० सप्टेंबर २०२५: गेल्या चार दिवसांपासून दुपारनंतर कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आधीच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असताना या पावसामुळे पाणीसाठा ओसंडून वाहू लागला आहे. परिणामी तब्बल १४ धरणांतून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला असून, गंगापूर धरणातून ४१४ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

हवामान विभागाने १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागासह स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगून आवश्यक ती तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, गुरुवारी (दि. १९) ४१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून सुमारे ४ हजार हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने पिके सडत आहेत, तर फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  शुक्रवारपासून दहावीची परीक्षा

सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ९९.११ टक्के तर गंगापूर धरणात ९८.८५ टक्के पाणीसाठा आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास गोदावरीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजनाला सुरुवात केली आहे.

धरणांमधील पाणी विसर्ग (क्यूसेक):

  • दारणा : ८५०
  • गंगापूर : ४१४
  • वालदेवी : १०७
  • आळंदी : ८७
  • भावली : १३५
  • भाम : ३७४
  • वाघाड : २०६
  • पालखेड : ८६६
  • नांदूरमध्यमेश्वर : ४७६९
  • करंजगाव : ४५१
  • कडवा : ८४०
  • तिसगाव : ३१
  • गौतमी गोदावरी : १४४
  • कश्यपी : १६०

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790