नाशिक (प्रतिनिधी): रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरतील, अशाप्रकारे वाहने उभी करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो आहे. याअंतर्गत व्यावसायिकांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.
याशिवाय स्ट्रीट क्राइमला चाप बसवीत टवाळखोर, गुन्हेगार, बेशिस्त नागरिकांवर कारवाईला सुरवात केली आहे. सोमवारी (ता. ४) नाशिक रोड, उपनगर, अंबड, इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये रिक्षाचालक, हातगाडी चालकांविरुद्ध एकूण १८ गुन्हे दाखल केले आहेत.
शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होते आहे. अशात वाहनतळाची समस्यादेखील प्रकर्षाने जाणवते आहे. भररस्त्याने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर होतो. यामध्ये रिक्षाचालक, वाहनचालक आणि विक्रेतेदेखील कारणीभूत ठरतात.
अशा बेशिस्त चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये फळविक्रेते ७ जण, खाद्यपदार्थ विक्रेते चौघे असून, बेशिस्तीने रिक्षा उभी केलेले सहा आणि एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे.