नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जवळपास साडेबारा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यासाठी पुढील आठवड्यात निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
जवळपास १७५ कोटींचा हा प्रस्ताव असून, प्रकल्प पूर्ण झाल्यास पाणीगळती कमी होण्याबरोबरच जलवाहिनी फुटल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार बंद होणार आहे.
शहराला गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास ५५ टक्के पाणीपुरवठा गंगापूर धरणातून होतो.
गंगापूर धरणातून कच्च्या स्वरूपात पाणी उचलले जाते व ते पाणी बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचून तेथे शुद्ध करून जलकुंभाच्या माध्यमातून शहरभर स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो.
गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र हे अंतर साडेबारा किलोमीटर आहे. सध्या सिमेंट पाईपलाईनद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. सिमेंट पाइप वारंवार फुटत असल्याने पाणीगळती होते व पाणीपुरवठा अनेकदा खंडित करावा लागतो.
त्यामुळे साडेबारा किलोमीटर अठराशे मिलिमीटर व्यासाची लोखंडी पाइपलाइन टाकण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी यासाठी मंजूर झाला.
प्रकल्पासाठी २०४ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे महासभेने प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक छाननीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला.
प्राधिकरणाने प्रस्तावात सुधारणा सुचविल्यानंतर मंजुरी दिली. त्यानुसार आता पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.