मनसे नगरसेवक सलीम शेख यांनी महासभेत मांडले जनतेचे प्रश्न
नाशिक (प्रतिनिधी): शहरात सीएनजी गॅस पाईपलाईनच्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची हानी झाली असून दरवर्षी प्रमाणे नाशिककरांना खोदून ठेवलेल्या आणि चाळण झालेल्या रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यात जनतेच्या समस्या मांडायला लागल्यावर अधिकारी म्युट करून टाकत असल्याचा आरोप सलीम शेख यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत केला.
गॅस पाईपलाईनच्या कामामुळे निर्माण झालेला मनस्ताप नाशिककरांना सहन करावा लागत असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाईचा इशारा मनपा महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे. परंतु ठेकेदारासह मनपाच्या बांधकाम विभागावर देखील कारवाई करण्याची मागणी मनसेचे शेख यांनी केली आहे. ठेकेदाराने रस्ता नुकसानीबाबत किती पैसे भरले आहेत याचा सविस्तर खुलासा करावा असे त्यांनी सांगितले.
गॅस पाईपलाईनचे काम रस्त्याच्या एका साईडने केले असते, तर ते जनहिताचे झाले असते असाही पर्याय त्यांनी दिला. जनतेला नाहक त्रास होत असल्याचे काम म्हणजे नाशिककरांकडून जमा केलेल्या कररुपी गंगाजळीची उधळपट्टीच असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पावसाळ्यानंतर येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला घेरण्यासाठी विरोधकांनी चांगलीच कंबर कसल्याचे व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे झालेल्या महासभेतून दिसून येत आहे.
मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले की, शहरात जनतेच्या प्रश्नांचे निरसन होणे गरजेचे असतांना मात्र जनतेचे समस्या मांडतांना वारंवार म्युट केले जात आहे.
ठेकेदारांनी रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा केली असून बांधकाम खाते संबंधित ठेकेदाराना पाठीशी घालत आहेत. याबाबत नेमकी माहिती बांधकाम खात्याने त्वरित द्यावी. ठेकेदारांनी खोदलेले खड्डे ज्या प्रकारे बुजवले त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांचे जिवघेणे अपघात होत आहेत. त्यामुळे पालिका अधिकारी देखील यात दोषी असून पालिकेचा रिमोट कंट्रोल योग्य आणि जबाबदार हातात असावा असे त्यांनी येणाऱ्या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर सुचविले आहे.