मुंबई | दि. १५ जून २०२५: राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार एंट्री घेतली असून, हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून, सात जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ आणि काही भागांना ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि मराठवाडा परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह कोकणात सलग पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबई परिसरात आकाश ढगाळ असून, काही भागांमध्ये रात्रभर रिमझिम सुरु आहे. यामुळे मुंबईसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मे महिन्यात पहिल्याच वळणात मुसळधार पाऊस पडूनही त्यानंतर काहीसा खंड पडला होता. मात्र, आता पुन्हा मुसळधार पावसाचा जोर दिसून येत आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
- रेड अलर्ट: कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील २४ तासांत रत्नागिरीतील राजापूर येथे तब्बल २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गमध्येही १०० मिमी इतका पाऊस पडल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे.
- येलो अलर्ट: मुंबई, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्याला पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.