नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या दुगारवाडी धबधबा परिसरात काल रविवार विकेंड सुट्टीच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांमधून एक जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल दुपारी उशिरा ही घटना घडली असून वन विभागासह पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वरसह परिसरात दमदार पाऊस नसला तरी सातत्याने रिमझिम पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नवीन नाल्यांना वाहू लागलेले आहेत. तसेच धबधबे देखील वाहू लागले आहेत.
त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधबा देखील ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
शनिवार-रविवारी वीकेंडला मोठ्या प्रमाणावर नाशिकसह राज्यभरातील पर्यटक दुगारवाडी धबधब्याला भेट देत असतात. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शनिवारीच पोलिसांकडून येथील पर्यटकांना सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र रविवारी पर्यटकांची गर्दी होऊन दुपारी चार वाजेच्या सुमारास नदीचे पाणी वाढल्याने नाशिक येथील सतरा वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
त्र्यंबकेश्वर जवळील काचूर्ली परिसरात दुगारवाडी धबधबा येथे काल दुपारी 4 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील 17 वर्षीय अमित शर्मा हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी 7.30 पर्यंत शोध घेण्यात आला पण सापडून आला नाही. आज सकाळी पाच वाजेपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.