नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका येथील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने येथील वाहतूक बेटाचे दोन भाग करुन मुख्य महामार्ग सरळ करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी या परिसरातील वाहतूक बेटाची रुंदी कमी करण्यात येऊन सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेच्या वतीने वाहतूक बेट हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्ग सरळ जोडण्याचे काम हाती घेणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबई नाका परिसरातून रोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. परिणामी रोजच या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची स्थिती पहावयास मिळत होते.
याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलिस, महापालिका तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत मुंबईनाका वाहतूक बेटाची व्यापती कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. याच निर्णयाप्रमाणे सोमवारी पालिकेच्या वतीने वाहतूक बेट तोडण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, प्रारंभी वाहतूक बेट पालिकेच्या वतीने तोडण्यात आल्यानंतर महामार्गा प्राधिकरणाच्या वतीने हे काम हाती घेतले जाणार आहे. वाहतूक बेट हटविल्यानंतर वाहनधारकांना विना अडथळा पार जाता येणार आहे.