मुंबई। दि. १७ जुलै २०२५: सणा-सुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे, कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
या मागणीला 105 आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र जोडत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, असे म्हटले आहे.
आ.रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
105 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र:
दरम्यान रोहित पाटील यांनी प्लॅस्टिक फुलावर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीला विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल 105 आमदारांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे. ही महत्त्वाची बाब आमदार रोहित पाटील यांनी लक्षामध्ये आणून दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वस्त केले आहे.
कृत्रिम फुलांवर बंदी आणणार:
शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, आम्ही सीएमसोबत मिटींग असून त्यात हे ठरले आहे. कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसतो पण त्याचवेळी रासायनिक कलर वापरणेही यामुळे थांबेल, असे भरत गोगावले यांनी सांगितले आहे. आमदार महेश शिंदे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत हा मुद्दा चर्चेला आणला होता. त्यावर, हा निर्णय घेण्यात आला आहे.