नाशिक। दि. ३० मार्च २०२६ : शहरातील वाढत्या तापमानाचा विचार करून महापालिकेने उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष तयारी केली आहे. मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि बिटको रुग्णालय येथे एकूण २० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, उष्माघात कक्षांचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि अशक्तपणा यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दुपारच्या कडक उन्हामुळे शहरातील बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांकडून डोक्यावर कापड, टोपी किंवा छत्रीचा वापर केला जात असून, थंड पेयांच्या मागणीतही वाढ झाली आहे.
नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्याचे संरक्षण करणे आणि हलका आहार घेणे आवश्यक असल्याचे आवाहन सहायक आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी केले आहे.
![]()

