पुणे, दि. २१ मे २०२५: राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. 21 मे रोजी देखील राज्यातील विविध भागांमध्ये हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण, वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर , अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर , कोल्हापूर, सोलापूर, छ्त्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना 21 मे साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यात पावसाचं वातावरण असूनही विदर्भात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल आहे. उन्हाचा पारा आणि पावसाच्या धारा या दोन्हीमुळे वातावरणात दमटपणा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागत आहे. तर काही भागांत पावसाच्या आगमनामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.