नाशिक। दि. २५ ऑगस्ट २०२६: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज भरताना आवश्यक बाबींची पूर्तता करुन महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
महाडीबीटी 2.0 वर नोंदणीसाठी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम महाआयडी नव्याने तयार करणे आवश्यक आहे. मागील पोर्टलवरील जुना आयडी किंवा पासवर्ड आता आवश्यक राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून नवीन महाआयडी तयार करावा. आधार पोर्टलवरील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे.
तसेच नवीन अर्ज व नूतनीकरण अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडी व आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करायचा’ हा पर्याय निवडावा. अर्ज भरताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत.
शैक्षणिक वर्ष 2025-26 व त्यापूर्वीच्या वर्षांतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (फ्रीशिप) प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचे अर्ज वारंवार सूचना देऊनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी करावी.
त्यात काही त्रुटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्या तात्काळ दूर करुन परिपूर्ण अर्ज 30 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा कार्यालायाकडे मंजुरीसाठी पाठवावेत. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार आहे.
महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत परिपूर्ण अर्ज महाविद्यालयास सादर करावा अन्यथा शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांची राहील. सर्व महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची विहीत कालावधीत किंवा त्यापूर्वी प्राधान्याने कार्यवाही करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी केले आहे.
![]()


