नाशिक, दि. ८ जानेवारी २०२६: गुजरातला जोडणाऱ्या नाशिक–पेठ राष्ट्रीय महामार्गावर चाचडगाव टोलनाक्याजवळ बुधवारी (दि. ७) सकाळी स्कॉर्पिओ आणि एर्टिगा या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिर्डीहून देवदर्शन करून पेठकडे निघालेली स्कॉर्पिओ (क्रमांक जीजे-१५-सीआर-७९६४) आणि सिल्वासाकडून वेगाने येणारी एर्टिगा (क्रमांक डीडी-०१-वायवाय-९०१३) यांची जोरदार टक्कर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चाचडगाव टोलनाक्यावर कार्यरत रुग्णवाहिका चालक मयूर केंग आणि डॉ. खान यांनी तत्काळ मदतकार्य राबवत जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण तपासले जात असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
यांचा झाला मृत्यू:
पेठच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओमधील प्रवासी चोगालाल गुर्जर (७५, रा. देवगड, राजस्थान), एटिंगा कारमधील शाहरूख खान (रा. सिल्वासा) या दोघांसह आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे समजली नाही.
जखमींची नावे: किशनलाल गुर्जर (४५), गणेशी किशनलाल गुर्जर (४२) पूनम गुर्जर (२०), खुशी किशनलाल गुर्जर (१२), पायल पवार (१४), शीतल पवार (२२), काजल पवार (१०), मोनाली पवार (२०)
![]()

