नाशिक। दि. ११ एप्रिल २०२६: शहरातील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणात शुक्रवारी (दि. १०) झालेल्या सुनावणीत पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर कंपनीतील ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानी हिला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश देण्यात आले.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान हा गुन्हा गंभीर आणि पूर्वनियोजित स्वरूपाचा असल्याचे सरकार पक्षाने नमूद केले. तपासादरम्यान आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याने संशयितांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. अनिकेत आव्हाड यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर सहायक पोलिस निरीक्षक गौतम सुरवाडे यांनी अश्विनी चैनानीसाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
या सुनावणीत अभियोग कक्षाच्या सहायक संचालक अॅड. किरण बेंडभर उपस्थित होत्या. बचाव पक्षातर्फे अॅड. राहुल कासलीवाल, अॅड. बाबा सय्यद आणि अॅड. हनीफ सय्यद यांनी बाजू मांडली.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. सहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एक संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तपास पथकाच्या माहितीनुसार, काही आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना इतर गुन्ह्यांमध्ये वर्ग करण्यासाठी ट्रान्सफर वॉरंट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, पीडितांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कंपनीतील महिला असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे पीडितांना वारंवार त्रास सहन करावा लागल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. वेळेवर दखल घेतली असती तर शारीरिक व मानसिक छळ टाळता आला असता, असेही न्यायालयात सांगण्यात आले.
कंपनीमधील पीडित महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे. पीडितांनी अन्यायाविरुद्ध तक्रार द्यावी. नागरिकांनी कंपनीमधील शोषणाबाबत माहिती द्यावी, माहिती देणाऱ्या महिला किंवा पुरुषाचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या वतीने सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी केले आहे.
![]()

