नाशिक (प्रतिनिधी): द्वारका उड्डाणपुलावर टेम्पो- ट्रकमध्ये झालेल्या अपघातात नऊ जणांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मागील बेशिस्त वाहतूक करणान्यासन वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. पंधरवड्यात सुमारे ४ हजार ५९६ वाहनचालकांना दंड ठोठावला आहे. बुधवारी (दि. २९) दिवसभरात ३०३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली.
द्वारका उड्डाणपुलावर युवकांची वाहतूक करणारा भरधाव मिनी टेम्पो एका लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकवर पाठीमागून येऊन धडकला होता. या भीषण अपघातानंतर उड्डाणपुलासह शहरातील महामार्गावरील व अंतर्गत रस्त्यांवरील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला.
अवजड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, टेललाईट-रिफ्लेक्टर बसविण्याकडे कानाडोळा करत वाहने चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करत वाहने दामटविणे, लेन कटिंग करणे आदी वाहतुकीच्या नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.
यानुसार पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त सुधाकर सुरडकर यांनी वाहतूक शाखेच्या चारही युनिटच्या निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहे.
१३ जानेवारीपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानुसार बुधवारपर्यंत (दि. २९) ४,५९६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती खांडवी यांनी दिली. या मोहिमेदरम्यान आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांनी एकूण १०३२ वाहनांना रिफ्लेक्टर (रेडियम) बसविल्याचे त्यांनी सांगितले.
👉 कारवाई दृष्टिक्षेपात अशी… (१३ ते २९ जानेवारी)
👉 सिग्नलचे पालन न करणे: ८७८
👉 विरुद्ध दिशेने वाहतूक: ८३७
👉 क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक: २०२
👉 उड्डाणपुलावर दुचाकी प्रवेश: ३६९
👉 उड्डाणपुलावर ऑटोरिक्षा प्रवेश: ५०
👉 विनानंबर प्लेट वाहतूक: ५३
👉 इतर प्रकरणे: १०६०