राज्यात आज (दि.14 एप्रिल) रात्री 8 पासून 1 मे पर्यंत कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद?

जाणून घ्या १४ एप्रिल २०२१ रात्री 8 पासून 1 मे पर्यंत कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद असणार आहे…

मुंबई (प्रतिनिधी): राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा फेसबुक लाईव्हद्वारे केली आहे. या पंधरा दिवसांत साखळी तोडण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. सोबतचं या काळात सर्वसामान्य गटातील नागरिकांसाठी मदत जाहीर केली आहे.

  • १४ एप्रिल २०२१ सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.
  • मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.
  • उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम चालू.
  • पुढचे 15 दिवस संचारबंदी.
  • अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.
  • घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये. 
  • आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. 
  • सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
  • लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.
  • जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.
  • पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील.
  • अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.
  • रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.

सर्व दुर्बल घटकांना दिलासा
आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

एक महिना मोफत अन्नधान्य
अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य  देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत
राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य
या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे 35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.

बांधकाम कामगारांना अनुदान
नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील 25 लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य
राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

आदिवासी कुटुंबांना सहाय्य
आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे 12 लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

कोविडवरील सुविधा उभारणी
याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे 3 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

टीप: या बातमीमध्ये टाकलेले काही फोटो हे वरिष्ठ छायाचित्रकार विरू कदम यांनी गेल्या वर्षीच्या (२०२०) लॉकडाऊन दरम्यान टिपलेले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790