नाशिक। दि. २ एप्रिल २०२६: नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून शहरात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आक्रमक भूमिका घेत हर्षद पाटणकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.
टोळीचा प्रमुख हर्षद सुनील पाटणकर (वय २६, रा. बेथेलनगर) हा गेल्या सुमारे दहा महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर गोळीबार, प्राणघातक हल्ले तसेच मालमत्तेचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अत्यंत बारकाईने सापळा रचत काही दिवसांपूर्वी त्याला नाट्यमयरीत्या अटक केली. तपासात पाटणकरने सराईत गुन्हेगारांची टोळी तयार करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे उघड झाले आहे.
ही टोळी आर्थिक फायद्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. संबंधित प्रकरणाचा सविस्तर प्रस्ताव उपायुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर आयुक्तांनी मोक्का लागू करण्यास हिरवा कंदिल दिला.
या कारवाईत हर्षद पाटणकरसह त्याच्या टोळीतील महेश सोनवणे ऊर्फ चिमण्या, श्रवण पगारे, प्रदीप शेवाळे, मयूर वानखेडे, मयूर निकम आणि निखिल जाधव यांचा समावेश आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल अहवाल तयार केला होता.
मोक्काअंतर्गत झालेल्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
![]()

