नाशिक। दि. २८ जुलै २०२६ : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तसेच अटक टाळून मदत करण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर (सध्या श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे, जि. अहिल्यानगर) यांच्यासह सुनील शिवाजी बोराडे आणि जगदीश तुकाराम बोराडे (दोघेही रा. पाटोदा, ता. येवला) यांना अटक करण्यात आली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा येथील एका गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला आरोपी न करण्यासाठी व अटक होऊ नये यासाठी मदत करण्याच्या बदल्यात बहीर यांनी खासगी मध्यस्थामार्फत चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या नाशिक विभागातील अधिकारी पूनम केदार, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे आणि सुरेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.
फोन-पेवर ५० हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप
तपासादरम्यान आरोपींनी लाचेच्या रकमेत तडजोड करून २ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याचे समोर आले. तसेच या व्यवहारातील ५० हजार रुपये ९ एप्रिल रोजी फोन-पे (PhonePe) द्वारे स्वीकारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, खासगी मध्यस्थाच्या माध्यमातून फोन-पेवर लाच स्वीकारल्याची उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याविरुद्धची ही नाशिक जिल्ह्यातील पहिली नोंद झालेली कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे.
![]()


