राज्यात २० जूननंतर मान्सूनची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता

मुंबई। दि. १५ जून २०२६: केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर वेगाने प्रगती करणाऱ्या नैऋत्य मान्सूनचा महाराष्ट्रातील पुढील प्रवास सध्या मंदावला असून, त्याची वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २० जूनदरम्यान नाशिक, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही भागांत उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० जूननंतर मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानकडून वाहणारे अतिउष्ण आणि कोरडे वारे तसेच बंगालच्या उपसागरात आवश्यक ती कमी दाबाची प्रणाली निर्माण न झाल्याने मान्सूनच्या हालचालीवर परिणाम झाला आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे.

मान्सूनला गती मिळण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे आवश्यक असते. मात्र, २० जूनपर्यंत अशी कोणतीही अनुकूल हवामान प्रणाली विकसित होण्याची चिन्हे नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. परिणामी, राज्यातील अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६३४ ग्रॅम सोन्याची लगड अवघ्या चार तासांत मालकाकडे परत

३१ ऑगस्टपर्यंत पाणी नियोजनावर भर:
दरम्यान, राज्यातील अपुरा पाऊस आणि धरणांतील घटलेला जलसाठा लक्षात घेता पाणी व्यवस्थापनाबाबत शासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. सिंचन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790