नाशिक। दि. २६ जुलै २०२५: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, भंडारा, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर आज (२६ जुलै) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकणातील वर्धा, नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील ३ ते ४ तास महत्त्वाचे:
मुंबईसाठी पुढील ३ ते ४ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत आज ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत शहरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, उथळ ठिकाणी पाणी साचण्याची भीती आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाला जलद उपाययोजना करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. पुण्यातही घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट असून, शहरात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.
अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा:
हवामान विभागाने २६ आणि २७ जुलै रोजी विशेषतः कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर, गोंदिया, पालघर आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे, तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील १६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धाराशिव, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार येथेही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २५ जुलैपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790