पुणे । ५ मे २०२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. तसेच, दुपारी 1 वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशिअल वेबसाईट https://www.mahahsscboard.in/ वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, उद्यापासून (6 मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
यंदाही मुलींची बाजी, मुलांचा निकाल 5.07 टक्यांनी कमी
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.
यंदा निकालाचा टक्का घसरला
यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 नं घसरला आहे.
विभागनिहाय निकाल
👉 कोकण: 96.74 टक्के
👉 पुणे: 91.32 टक्के
👉 कोल्हापूर: 93.64 टक्के
👉 अमरावती: 91.43 टक्के
👉 छत्रपती संभाजीनगर: 92.24 टक्के
👉 नाशिक: 91.31 टक्के
👉 लातूर: 89.46 टक्के
👉 नागपूर: 90.52 टक्के
👉 मुंबई: 92.93 टक्के
परीक्षेवेळी गैरप्रकार झाल्याचं आढळलेल्या 124 परीक्षा केंद्रांची कसून चौकशी
बारावीची परीक्षा ज्या परीक्षा केंद्रांवर पार पडली, त्या एकूण 3373 परीक्षा केंद्रांपैकी 124 परीक्षा केंद्रांची चौकशी होणार आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं आढळल्यामुळे या केंद्रांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान, केंद्रांची चौकशी करताना, केंद्रांवर परीक्षेवेळी झालेला गैरप्रकार सिद्ध झाल्यास किंवा त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार आहे.
कॉपी प्रकरणात 124 केंद्रांची चौकशी
गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेवेळी कॉपी होण्याची प्रकरणं वाढली आहे. नव विभागीय मंडळात कॉपी प्रकरणी 124 केंद्रांवर चौकशी करुन त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. त्यात पुण्यातील 45, नागपुरातील 33, छत्रपती संभाजी नगरमधील 214, मुंबईतील 9, कोल्हापुरातील 7, अमरावतीतील 17, नाशकातील 12, लातुरातील 37 अशा एकूण 374 कॉपी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
![]()

