रसुवा जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क
नाशिक। दि. २७ ऑगस्ट २०२६: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे नाशिक जिल्ह्यातील काही पर्यटक अडकले असण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गेलेले आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा पर्यटक संपर्काबाहेर असल्यास त्यांच्या नातेवाइकांनी विलंब न करता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका विविध देशांमधून नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांना बसला असून, महाराष्ट्रातील काही नागरिकही संबंधित भागात अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अडकलेल्या नागरिकांची माहिती मिळवून त्यांच्यापर्यंत आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कार्यवाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनानेही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कोणताही नागरिक अथवा पर्यटक नेपाळमध्ये अडकला असल्यास त्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा जिल्हा प्रशासनाला कळवावी, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.
येथे साधावा संपर्क:
अडकलेल्या नागरिकांची माहिती नोंदविण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कुटुंबीयांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन आवश्यक तपशील नोंदवावा.
नागरिकांची माहिती नोंदविण्यासाठी ऑनलाइन लिंक: https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष : 0253-2317151 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
![]()


