नाशिक। दि. ११ जुलै २०२६: वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवरील व्याजापोटी सन २०२५-२६ अंतर्गत नाशिक परिमंडळाअंतर्गत नाशिक, मालेगाव व अहिल्यानगर मंडळातील एकूण २३ लाख ६४ हजार ८७२ ग्राहकांना व्याजाच्या रूपाने २४ कोटी ७२ लाख ८१ हजार रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यात वीज बिलातून समायोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.
याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीज वापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका वीज देयकाच्या रकमेइतकी होती. आता वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे.
तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीज बिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी नाशिक मंडळातील १० लाख ८३ हजार ८७३ ग्राहकांना १४ कोटी ८३ लाख ७२ हजार, मालेगांव मंडळातील ३ लाख ९० हजार २५१ ग्राहकांना २ कोटी २९ लाख ८२ हजार, अहिल्यानगर मंडळातील ८ लाख ९० हजार ७४८ ग्राहकांना ७ कोटी ५९ लाख २७ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. नाशिक परिमंडळ अंतर्गत संबंधित वीजग्राहकांना यापूर्वी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे तरी सदर सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
![]()


