नाशिक। दि. २६ जून २०२६: नाशिक शहर आणि परिसरात गुरुवारी (दि. २५) सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने पाठ फिरवली. हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असला, तरी शहरात दिवसभर पावसाचा थेंबही पडला नाही. उलट कडक उन्हासह मंदावलेल्या वाऱ्यामुळे उष्णता आणि आर्द्रतेचा प्रभाव वाढल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. गुरुवारी कमाल तापमान ३२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
हवामान विभागाने शुक्रवार (दि. २६) आणि शनिवार (दि. २७) या दोन दिवसांसाठी पुन्हा ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सूनच्या आगमनानंतरही गेल्या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. जून महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना अपेक्षित पर्जन्य न झाल्याने खरीप हंगामाच्या नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चालू पावसाळी हंगामात आतापर्यंत नाशिकमध्ये ५६.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काळात, विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचा जोर वाढल्यास जून महिन्यातील पर्जन्यतूट भरून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
![]()


