नाशिक (प्रतिनिधी): शुक्रवारी पहाटे उत्तर भारतातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळ आणि पावसामुळे सात जणांचा मृत्यू झाला तर डझनभर जखमी झाले आहे. शेकडो ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. दिल्लीतील नजफगड येथे वादळात झाड मोडून पडल्याने एक घर कोसळले, त्यात तीन मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीला ढिगाऱ्यातून जिवंत वाचवण्यात आले. दिल्लीत अवघ्या ३ तासांत ७७ मिमी पाऊस पडला आहे.
महाराष्ट्रात चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता:
तीन मे शनिवारी रोजी विर्दभात काही ठिकाणी तसेच नाशिकसह मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तुरळक जागी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, कोकण, गोवामध्ये हवामान कोरडे रहाण्याची शक्यता आहे. चार ते सहा मे दरम्यान राज्यात नाशिकसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमी वादळी वाऱ्यासह तुरळक जागी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सदर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम व नाशिक घाट विभागात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
वाढलेली आर्द्रता आणि वारा यामुळे मुसळधार पाऊस पडला: तज्ज्ञ
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांच्या संयोगाने दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअस पुढे गेल्याने आर्द्रतेत झपाट्याने वाढ झाली. वादळे निर्माण झाली ही मान्सूनपूर्व सामान्य घटना आहे, असे खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे महेश पलावत यांनी सांगितले. असे हवामान सुमारे एक आठवडा टिकू शकते. मे महिन्यात उत्तर भारतातील अनेक भागात सामान्यपेक्षा जास्त उष्णता जाणवण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
![]()

