नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सूर्याच्या प्रखर किरणांमुळे व दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने रविवारी (दि.१९) शहरात कमालीचा उकाडा जाणवत आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना, दुसरीकडे दिवसभर ढगाळ वातावरण अन शहराच्या शनिवारी काही भागात वीज पुरवठा बंद राहिल्याने उकाड्यात वाढ झाली होती, त्यातच नाशिकचे कमाल तापमान आज (दि. १९) पुन्हा ४०.३ अंश सेल्सिअसवर पोचले आहे.
शनिवारी (दि. १८) नाशिकचे किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले तर कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वळिवाचा पाऊस पडत असल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.
कमाल तसेच किमान तापमानातही घसरण झाली होती. त्यात वातावरणात वाहत असलेल्या वाऱ्यामुळे उष्णता जाणवत नव्हती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिवसा ढग दाटून येत असताना पाऊस मात्र हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. शनिवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.
त्यातच मधूनच सूर्य आग ओकत असल्याने उष्णतेत भर पडली. दिवसभर उष्णता जाणवत असताना सायंकाळीही उकाडा कायम होता. त्यामुळे घर असो किंवा कार्यालय उष्णतेपासून बचावासाठी फॅन, कुलर व एसी यांसारख्या साधनांवर अवलंबून राहावे लागले. रात्रीच्या वेळीदेखील फारसा वारा नसल्याने उष्णता जाणवत होती. अशीच स्थिती राहिल्यास येत्या एक दोन दिवसात नाशिकचे कमाल तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता आहे. कदाचित यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंदही होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.