
नाशिक: एका ‘कट’मुळे घडला मोठा अपघात, 4 मित्र जागीच ठार
नाशिक (प्रतिनिधी): कार्यक्रमासाठी गेलेल्या चार मित्रांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
मनमाडपासून जवळ असलेल्या पुणे-इंदौर महामार्गावर ही घटना घडली.
5 मित्र सियाज मारुती कारमधून येवल्याकडून मनमाडला येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कट मारला.
यामुळे चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चार मित्र जागीच ठार झाले. अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.
- कसारा घाटात अपघात: क्रुझवरील नियंत्रण सुटले, एक बालिका ठार तर ७ जखमी
- नाशिक: रिक्षातील प्रवासाचा बहाणा करत लुटणाऱ्या दोन महिलांना अटक!
- नाशिक: लहान भावाच्या पत्नीचा मोठ्या भावाकडून विनयभंग
हे सर्व जण पाच मित्र एका कार्यक्रमासाठी येवला येथे गेले होते. त्यानंतर अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर जेवायला गेले होते, मनमाडकडे येताना अपघात हा झाला. या अपघातात कार झाडावर आदळल्याने पाच पैकी चौघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांना वेळ लागला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच मयतांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली.
या अपघातानंतर पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमीला रुग्णालयात आणण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर वाहतूक सुरळीत केली गेली.